… शिळ्या कढीला ऊत आणला जातोय, औरंगाबाद नामांतरप्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरून धुराळा उठत असतानाच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नामांतरचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला चक्क ढोंगीपणाची उपमा देत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही काँग्रेसने केली.
यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत:च्या ट्विटरवरून अधिकृत भूमिकाच आज जाहीर केली. त्यामुळे औरंगाबाद नामांतरप्रश्नावरून महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद नामांतर प्रश्नावरून स्थानिक पातळीवर आणि राज्यस्तरावर शिवसेना विरूध्द भाजपा आणि शिवसेना विरूध्द काँग्रेस असा राजकिय सामना रंगला आहे. याप्रश्नावर आतापर्यत शिवसेनेने अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही यासंदर्भात थेट वक्तव्य करण्याचे टाळले. मात्र काल शनिवारी एका कार्यक्रमात शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच आणणार असल्याचे जाहीर करत शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
त्यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर पत्रक काढत म्हणाले की, औरंगाबाद नामांतर प्रश्नावरून काहीजण धुराळा उडवत आहेत. काही मंडळी शिळ्या कढीला ऊत आणून राजकिय स्वार्थ साधू इच्छित आहेत. मात्र काँग्रेसने भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र मागील पाच वर्षात एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय? केंद्रात आणि राज्यात मांडीला मांडी सत्ता भोगत होते. तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही असा सवाल उपस्थित केला. राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा सामना सुरु केला असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
358 total views, 2 views today